राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राजगुरूनगर नगरपरिषद आणि पोलीस विभागाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना केली जात आहे. मास्क न लावणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. दिवसभरात मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून साडेबारा हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, वाहतूक पोलीस हवालदार सर्जेराव बागल यांनी दिली.
चाकण आणि राजगुरूनगर परिसरात करोनाची तीव्रता वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून येथे नाकाबंदी करून संयुक्त कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. वाडा रोडवरील पाण्याची टाकी येथे केलेल्या कारवाईत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील तिन्हेवाडी रस्त्यावर केलेल्या कारवाईत साडेसात हजरांचा दंड वसूल करण्यात आला आहे.