पुणे : महाराष्ट्रातील 200 गावांना भूस्खलनाचा तीव्र धोका आहे, त्यात पुणे जिल्ह्यातील 72 गावांचा समावेश आहे, अशी धक्कादायक माहिती जीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आली आहे. त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या माळीण दुर्घटनेची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे.
बृहनमुंबई महापालिकेच्या विनंतीनुसार जीएसआयने हे सर्वेक्षण केले. त्यात 225 गावांची पहाणी करण्यात आली. त्यात भूस्खलनाची वर्गवारी चार गटात करण्यात आली. सर्वाधिक भूस्खलनाचा धोका असणरी गावे 47 आहेत. रायगड जिल्ह्यात 103, पुणे जिल्ह्यात 72 तर रत्नागिरीतील 45 गावांना भूस्खलनाचा धोका आहे. ठाण्यातील पाच गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अहवाल संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. या 225 गावांपैकी 47 गावे अतीधोकादायक अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
जीएसआयने 2015 ते 2018 या काळात राबवलेल्या दोन पहाणी अहवालातून ही बाब उघड झाली आहे. पश्चिम घाटातील दरड कोसळण्याच्या घटनांचा अभ्यास जिएसआय 1980 पासून करत आहे. राष्ट्रीय दरड शक्यता मोजमाप कार्यक्रमानुसार दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या महाराष्ट्रातील 28 हजार किमी पर्वतीय प्रदेशाची पहानी 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
2019अखेर यातील 21 हजार 500 किमीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात 800 चौरस किमी क्षेत्र अतीउच्च धोकादायक स्थितीत आहे. त्यापाठोपाठ सात हजार 713 किमी क्षेत्राला मध्यमस्वरूपाचा धोका आहे.