केडगाव-धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे शल्य समाजातील बांधवांना सतावत आहे. किती सरकारे आली आणि गेली परंतु मागील कित्येक वर्षापासून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील समवेशाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. रानोमाळ आणि डोंगरमाथ्यावर भटकंती करून पशुधन वाचवणारा मेंढपाळ समाज आपली उपजीविका करीत असताना त्यांच्या भटकंतीचा शासनाला नेमका कोणता पुरावा पाहिजे, हे मात्र न सुटणारे कोडे आहे.
2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी बारामती या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळाव्यात म्हणून मोठे आंदोलन झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन हायजॅक करीत पाच वर्ष राज्यात सत्ता मिळवली.पाच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवून देखील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. अभ्यास सुरू आहे, समिती नेमण्यात आली आहे, अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार, अशी जुजबी उत्तरे देऊन फडणवीस यांनी पाच वर्ष सत्ता उपभोगली.
प्रश्न सोडविण्या ऐवजी मिळाली फक्त आश्वासने त्यामुळे या समाजाला आजही पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील वर्षी सन 2019 साली राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार सध्या सत्तेवर काम करीत आहे. उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्ती असुन कोणताही प्रश्न ते तातडीने हाताळतात असे चित्र राज्यात त्यांची सत्ता आल्यापासून दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समवेशाचा प्रश्न ते यशस्वीपणे हाताळतील अशी अपेक्षा धनगर समाजाला आहे. धनगर समाजाच्या अनेक वर्षापासून असणाऱ्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त होऊन त्यांच्या एसटी प्रवर्गातील समवेशाचा मार्ग मोकळा होईल अशी भावना समाजातील बांधवांच्यात निर्माण झाली आहे.
- राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा-
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समवेशाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वीपणे हाताळतील अशी अपेक्षा धनगर समाजाला आहे. सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. राज्य शासनाने धनगर समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आहे. असा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.