कोयनानगर, {विजय लाड} – पाटण तालुक्यात तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसाने आठ ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. या गावातील 540 दरडग्रस्त कुटुंबांना कायमस्वरुपी घरे देण्याच्या कामाचा शुभारंभ नऊ मार्च रोजी झाला.
शासनाच्या नगर विकास खात्याचा एमएमआरडीए विभाग त्यांना घरे बांधून देणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, केवळ तीन दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला असून आता एमएमआरडीएऐवजी बांधकाम विभाग दरडग्रस्तांना घरे बांधून देणार असून त्याला एमएमआरडीएने दुजोरा दिला आहे.
पाटण तालुक्यात मुसळधार पावसाने बाधित गावांतील अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. या आठ गावांतील 540 कुटुंबांचा निवारा हरपला होता. ही दरडग्रस्त जनता तीन वर्षांपासून तात्पुरत्या निवारा शेडमध्ये वास्तव्य करत आहे. दरडग्रस्त कुटुंबांना कायमस्वरुपी घरे देण्याचा उपक्रम ना. शंभूराज देसाई यांच्या मागणीवरून शिंदे सरकारने केला आहे.
मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, आंबेघर वरचे, आंबेघर खालचे, शिद्रुकवाडी, जितकरवाडी व काहीर या आठ गावांतील 540 कुटुंबांना खासगी व शासकीय जागेवर शासनाकडून कायमस्वरूपी घरे बांधून देण्यात येणार आहेत.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 165 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही घरे बांधण्यासाठीची जबाबदारी विशेष बाब म्हणून एमएमआरडीएकडे देण्यात आली होती. एमएमआरडीएने आराखडा तयार करुन नऊ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन केले.
13 मार्च रोजी शासनाने दरडग्रस्तांना घरे बांधून देणारी एजन्सी बदलली आहे. आता एमएमआरडीएकडून हे काम काढून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे.
दरडग्रस्तांसाठी बांधण्यात येणारी घरे एमएमआरडीए विभागाकडून काढून ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. 13 मार्च रोजी हा आदेश एमएमआरडीए विभागाला देण्यात आला आहे. – भगवान चव्हाण (अधीक्षक अभियंता, एमएमआरडीए)