औरंगाबाद – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला आहे. आज 1 मे आहे. 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असून हिंदूंना माझी विनंती आहे की, जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी. एकदा होऊनच जावू द्या काय व्हायचं ते असं भडकावू आवाहनही राज यांनी केलं. यावर आता औऱंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.
जलील म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमवर निर्णय घेईल. राज यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे मुस्लिमांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, अशी संयमी भूमिका जलील यांनी घेतली.
दरम्यान राज ठाकरे तरुणांची आणि समाजाची दिशाभूल करत आहेत. राज यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा की नाही हे तरुणांनी ठरवायचं. युवापिढी नोकऱ्यांसाठी भटकत आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी राज त्यांना भलतीकडेच भरकटवत आहेत. तसेच समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
जलील यांनी मुस्लीम समाजाला सुर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन कऱण्याची विनंती केली. तसेच भोंग्यांच्या विरोधात जी मुलं लाऊडस्पीकर लावतील, त्यांच्यावर गुन्हे दाखलं होतील. मात्र त्याचवेळी राज हे एसी कॅबिनमध्ये बसतील, असा टोलाही जलील यांनी लगावला.