औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादेतील सभेत भोंग्यावरून राज्य सरकारला 4 तारखेपर्यंचा अल्टिमेटम दिला आहे. 4 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जातात. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. आणि पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारला धारेवर धरलं. या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर आक्षेप घेत थेट इशारा दिला आहे. एकदा होऊन जाऊद्या म्हणजे काय? आम्हालाही बोलता येतं, त्यांच्यापेक्षा जास्त बोलता येतं, आमच्याही तोंडात जीभ आहे. राज ठाकरे समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, असे त्यांनी म्हंटले.