नवी दिल्ली – पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाला आज न्यायालयीन लढ्यामध्ये मोठे यश मिळाले. निवडणूक आयोगाने काढून घेतलेले क्रिकेटची बॅट हे निवडणूकचिन्ह पक्षाला पुन्हा देण्यात यावे, असे आदेश पेशावर उच्च न्यायालयाने आज दिले. पीटीआय पक्षाने घेतलेल्या पक्षांतर्गत निवडणुका फेटाळून लावत आयोगाने पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेतले होते. मात्र उच्च न्यायालयाने आयोगाचा हा निर्णय रद्दबातल ठरवला आणि बॅट हे निवडणूक चिन्ह पक्षाला पुन्हा परत मिळाले.
निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असताना एखाद्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाऊ शकणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पक्षांतर्गत निवडणुकांना काही नेत्यांनीही आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाच्या ५ सदस्यांनी चिन्ह रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मात्र निवडणुका तोंडावर असल्यामुळे या विषयावर त्वरित सुनावणी घेण्यातयावी, अशी मागणी इम्रान खान यांच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार आज ही सुनावणी घेण्यात आली.
पीटीआय पक्षाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यासाठी ३ डिसेंबर रोजी २० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार घेतलेल्या निवडणुका आयोगाने मान्य केल्या आणि पक्षाला प्रमाणपत्रही दिले होते. मात्र निवडणूक घेणारी व्यक्ती पात्र नव्हती असे सांगून आयोगाने चिन्ह काढून घेतले होते. मात्र हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.