नवी दिल्ली- रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले सेल्फी बूथ स्थापन करणे म्हणजे जनतेच्या कररूपी पैशाचा अपव्यय आहे. एकीकडे विरोधी पक्षांची सरकारे असलेली राज्ये केंद्राकडून मनरेगाच्या निधीच्या प्रतिक्षेत असताना पैसा अशा पध्दतीने वाया घालवला जातो आहे अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीची प्रतही खर्गे यांनी यावेळी सादर केली. त्यात ज्या रेल्वे स्थानकांवर स्थायी अथवा अस्थायी स्वरूपात असे सेल्फी बूथ स्थापन करण्यात आले आहेत त्यांची मध्य रेल्वेने दिलेली यादीच देण्यात आली आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार अ दर्जाच्या रेल्वे स्थानकावर अस्थायी स्वरूपात उभारण्यात आलेल्या बूथसाठी १.२५ लाख रूपये खर्च येतो तर क दर्जाच्या स्थानकावरील कायमस्वरूपी बूथसाठी ६.२५ लाख रूपये खर्च आहे.
मोदी सरकारला आत्ममुग्ध प्रचाराची कोणतीही मर्यादा आता राहीलेली नाही. रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारे मोदी यांचे ३ डी सेल्फी पॉइंट स्थापित करणे म्हणजे पूर्णपणे पैशांची बरबादीच आहे अशी टीका खर्गे यांनी केली. ते पुढे म्हणाले की सशस्त्र दलांना मोदींच्या कट आउटसोबत ८२२ सेल्फी पॉइंट स्थापन करण्याचे आदेश देणे म्हणजे बहादूर सैनिकांच्या बलिदानाचा राजकीय उपयोग करून घेण्यासारखे आहे. सरकारने राज्यांना दुष्काळ अथवा पूराच्या संकटात मदतीसाठी निधी दिला नाही. जेथे जेथे विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्या राज्यांना मनरेगासाठीचा निधी अद्याप देण्यात आलेला नाही.
मात्र अशा फुटकळ निवडणुकांच्या स्टंटसाठी पैसे करण्याचे दु:साहस सरकारकडून केले जाते अशी संतप्त प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली. मोदी यांच्या सेल्फी पॉइंटवरून अगोदरही वाद निर्माण झाला आहे. यूजीसे विद्यापीठांनी त्यांच्या मोदी यांचे कट आउट लावावेत आणि सेल्फी पॉइंट तयार करावेत असे निर्देश जारी केले होते. त्यालाही कॉंग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता. स्वत:च्या प्रचारासाठी सरकारी शिक्षण संस्थांचा वापर केला जात असल्याची टीका कॉंग्रेसने केली होती.