भोर, दि. 6 (प्रतिनिधी)-भोर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजनेतून गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याची एजन्सी घेतलेल्या ठेकेदाराकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. तसेच भोर नगरपालिका प्रशासनाचा यावर अंकुश नसल्याचे अनेकवेळा माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भोर नगरपालिका प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन भोर शहर राष्ट्रवादी व भोर शहर शिवसेना शाखेच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदार एजन्सीचे बिल गेल्या सहा महिन्यांपासून भोर नगरपालिकेने थकवले आहे. त्यामुळे ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी भोर शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत आहे. शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा; अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, भोर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन धारणे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष सुहित जाधव यांनी दिला आहे.
मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही भागात अशुद्ध पाणी येत आहे, हे खरे आहे. मात्र, फिल्टरेशनचे काम सुरू केले आहे. दोन दिवसांत ते काम पूर्ण होईल. शहराला शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. नगराध्यक्षा निर्मला आवारे म्हणाल्या की, जलशुद्धीकरणाचे काम सुरू असून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.