मुंबई – मंदीमुळे विविध देशाकडून खरेदी कमी होत आहे. भारताला मात्र खनिज तेल आणि इतर बाबीची आयात करावी लागत आहे. यामुळे निर्यातीपेक्षा आयात जास्त झाल्यामुळे भारताची दुसऱ्या तिमाहीत चालू खात्यावरील तुट वाढवून राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.4% इतके झाली आहे.
ही तूट वाढली तर इतर चलनाच्या तुलनेत रुपया घसरत असतो. पहिल्या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील केवळ 2.2 टक्के होती. मात्र त्यानंतर ही तुट वाढली असल्याचे दिसून आले. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताची दुसऱ्या तिमाहित चालू खात्यावरील तूट वाढून 36.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
या कालावधीत भारतातची व्यापारातील तूट वाढून 83.5 अब्ज डॉलरवर गेली आहे. ही तूट कमी व्हावी याकरिता निर्यात वाढविण्यासाठी वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारताने चर्चा सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया बरोबर व्यापार करार यशस्वी झाला असून या कराराच्या अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडबरोबर असा करार करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असून या संदर्भातील चर्चा चालू आहे.
भारतातील व्यापाऱ्यांनी डॉलरऐवजी रुपयाच्या माध्यमातून व्यापार करावा याकरिता रिझर्व्ह बॅंकेने बॅंका आणि व्यापाऱ्यांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काही देशाबरोबर व्यापाऱ्यांनी रुपयाच्या माध्यमातून व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात इतर देशाबरोबर असा व्यापार करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत आहे. भारताकडे डॉलरची गंगाजळी कमी झाल्यानंतर त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होते. याचा आयात करणाऱ्यांना जास्त त्रास होतो.