मुंबई – करोनाच्या दोन वर्षाच्या काळात भारताबरोबरच इतर देशातील बॅंकांनी भांडवल सुलभता निर्माण केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र 2022 मध्ये करोना संपुष्टात येत असतानाच विविध देशात महागाई वाढली. रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला. अशा परिस्थितीत भारताबरोबरच इतर देशाच्या शेअर बाजारावर या वर्षात बराच परिणाम झाला. तरीही वार्षिक पातळीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 4 % चा परतावा दिला आहे.
वर्षभर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर रेंगाळले. मात्र दिवाळी आल्यानंतर खरेदीचा जोर वाढला. एक डिसेंबर रोजी सेन्सेक्स 63,294 या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. मात्र नंतर चीनमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले. अमेरिकेत प्रदीर्घ काळ व्याजदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदाराबरोबरच भारतातील गुंतवणूकदार बिथरले.
वार्षिक पातळीवर सेन्सेक्सने केवळ 3 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक 9.24 टक्क्यांनी, जपान मधील शेअर बाजाराचे निर्देशांक 10.47 टक्क्यांनी, चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक 15.82 टक्क्यांनी कोसळले. फक्त भारतीय शेअर बाजाराने कमी का होईना यावर्षी परतावा दिला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
2008 मध्ये जागतिक आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी मात्र सेन्सेक्सने मार खाल्ला. त्यावर्षी सेन्सेक्स 50 टक्क्यांनी कोसळला होता. परदेशी गुंतवणूकदाराने 2008 मध्ये 1.21 लाख कोटीची गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र यावेळी असा प्रकार भारतीय शेअर बाजारात घडला नाही. परकीय चलन आणि भारत सरकारने महागाई नियंत्रणासाठी आणि विकास दर वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजना या कारणामुळे 2022 मध्ये 2008 सारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.
भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असण्याबरोबरच भारतातील कंपन्यांनी ताळेबंद चमकदार ठेवण्यात यश मिळविल्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपन्यावरील विश्वास वाढला. या काळात जीएसटीचे संकलन महिन्याला 1.4 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त होत आहे. त्याचबरोबर पीएमआय आगेकूच करीत आहेत.
किरकोळ गुंतवणूकदारांचा पुढाकार
यावर्षी अनेकदा परदेशी गुंतवणूक परत गेली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी याच काळात जोरदार खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. त्यामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारांची राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूक 7.42 टक्क्यावर गेली आहे. या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 19 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. शिवाय म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 40.49 लाख कोटीवर गेली आहे भारतातील संस्थागत गुंतवणूकदारांनी ही या काळात बरीच खरेदी केली.