मुंबई – भारतातील बॅंकांनी करोनाच्या काळात आणि नंतरही कर्ज वसुलीकडे लक्ष देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आता भारतातील बॅंकांची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता केवळ पाच टक्के असून ही ढोबळ अनुत्पादक मालमत्ता सात वर्षाच्या निचांकावर असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.
मात्र देशातील आणि परदेशातील अनेक नकारात्मक घटनांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि बॅंकिंग क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बॅंकांनी सावध राहण्याची सूचना कालच रिझर्व्ह बॅंकेने केली होती. व्याजदर वाढत असल्यामुळे कंपन्यांच्या आणि नागरिकांच्या कर्ज परतफेडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तो परिणाम होऊ नये यासाठी बॅंकांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे रिझर्व्ह बॅंकेने काल सुचविले होते.
आता रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कमी झाली असली तरी आगामी काळात ती वाढण्याचा धोका कायम आहे. बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कमी असल्याशिवाय बॅंका कर्ज पुरवठा करू शकणार नाहीत. कर्ज पुरवठा वाढविल्याशिवाय अर्थव्यवस्थेला वेग येणार नाही याची जाणीव बॅंकांनी ठेवावी असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.
बॅंकांबरोबर इतर वित्तीय संस्थांच्या कामकाजावर सध्याच्या परिस्थितीचा परिणाम होऊ नये याकरिता रिझर्व्ह बॅंक बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाने लघु उद्योगावर परिणाम होऊ नये यासाठी या क्षेत्राला दिलेल्या कर्जावर गॅरंटी दिली होती. आगामी काळात अशा प्रकारच्या मदतीची गरज भासणार नाही असे रिझर्व्ह बॅंकेने नमूद केले आहे.