मुंबई – चीनसह जवळपास 80 देशांत करोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. भारतातही याचे रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्वभूमीवर यंदा होत असलेली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ठरल्याप्रमाणे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशवासीयांच्या आरोग्याला स्पर्धेपेक्षा जास्त महत्त्व देत ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा प्रयत्न असून यंदाची स्पर्धा रद्ददेखील होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राज्य सरकार व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी यांच्यात आज (11 मार्च) एक महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर याबाबत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही स्पर्धेच्या आयोजनाबाबत सांगताना स्पर्धा पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या स्पर्धेला येत्या 29 मार्चपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे सामने ज्या मैदानांवर होणार आहेत, त्याची क्षमता 30 ते 60 हजार प्रेक्षकांची आहे, त्यामुळे सामन्यादरम्यान करोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका जास्त आहे, त्यामुळेच ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
स्पर्धा पुढे ढकलली गेली तर आशिया करंडक, टी-20 विश्वकरंडक तसेच अन्य मालिका येत्या वर्षांत भारतीय संघ खेळणार आहे, त्यामुळे मग आयपीएलसाठी वेळच नाही. अशा परिस्थितीत ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याऐवजी रद्दच होऊ शकते. मंडळाचे, संघ मालकांचे तसेच खेळाडूंचे व विविध राज्य संघटनांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या बैठकीतून काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकचा विरोध
महाराष्ट्रात आयपीएलचे सामने होणार का, ते अद्याप स्पष्ट झालेले नसताना आता कर्नाटक राज्य सरकारने ही स्पर्धा रद्द करा, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे.