मुंबई : करोना विषाणूंचा संसर्ग भारतातही काहींना झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळे त्याचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसत आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अध्यक्ष सौरव गांगुलीच्या हट्टापायी धोका पत्करून ही स्पर्धा वेळापत्रकानुसारच खेळविण्याचे ठरविले आहे. अब्जावधी रुपयांचा फायदा घेण्यासाठी गांगुलीचा हाच हट्ट देशातील नागरिकांच्या मुळावर तर येणार नाही ना, अशी चर्चा रंगत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली होती, मात्र, गांगुलीने ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल असे सांगून संभ्रम वाढविला आहे.
स्पर्धा पुढे ढकलली किंवा रद्द केली तर मंडळाला प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे, त्यामुळे मैदानात प्रेक्षकांना प्रवेश न देताच ही स्पर्धा खेळविण्याची कल्पना मंडळाने व्यक्त केली आहे. सामने पाहण्यासाठी मैदानावर हजारो प्रेक्षक येतील व त्यांना या विषाणूंची लागण झाली तर मोठे संकट निर्माण होईल, असे व्यक्त होत असल्याने मंडळाने ही युक्ती वापरणार असल्याचे संकेत दिले आहेत.