हजारो शिवभक्तांच्या उपस्थित पार पडला उद्घाटन सोहळा
पवनानगर – किल्ले तिकोणागडावर लोकवर्गणीतून आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने मजबूत व गडास साजेसा असा दरवाजा बसविण्यात आला. सुरक्षा द्वाराचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने व तमाम शिवभक्तांच्या सहकार्याने गडावर पुढील टप्प्यात जे डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या कामाच्या प्रतिकृतीचे अनावरणही आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे ठिकाणी प्रथमत: शिवपूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. तर गडसंवर्धनात मोलाची मदत व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचे सन्मान करण्यात आला. गडासाठी राबणाऱ्या गुरूदास मोहोळ यास महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने “दुर्गवीर’ हा पुरस्कर देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे वेळी ऍड. रवींद्र यादव यांचे दरवाजा इतिहास माहितीपर व्याख्यान झाले. उद्घाटन सोहळ्यानिमित्त वडगाव मावळ येथील विशाल लोकरे यांनी गडावर ठेवण्याकरीता कायम स्वरूपी अशी शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट केली. शिवभक्तांनीही गडसंवर्धनाच्या कामा करीता रोख 50 हजार रुपये निधी म्हणून देऊ केले.
या वेळी बोलताना शेळके म्हणाले की, मावळातील सर्व किल्ल्यांच्या संवर्धना करीता सर्वस्तरावर मदत केली जाईल. तसेच शासन स्तरावरही पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. तर संस्थेचे माध्यमातून गडावर मोठ्या प्रमाणात गडसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. त्या करीता सर्व शिवभक्तांनी मदत करावी, असे आवाहन गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी संदीप ओझरकर यांनी केले. या वेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, अमित गायकवाड, शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष, आग्रावीर मारुती गोळे, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य अनिल पवार, शिवजन्मोत्सव समितीचे, सदस्य मंदार मते, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, डॉ. सचिन जोशी, डॉ. राजेंद्र जाधवर, सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे संपर्क प्रमुख चेतन वाघमारे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. अंकुश ढोरे यांनी आभार मानले.
गडाचे पावित्र्य राखणार…
गडावरील रात्री अपरात्रीच्या मुक्त प्रवेशामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले होते. तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांकडून वास्तुंची नासधूस होऊ नये त्यांचा अटकाव व्हावा, गडाचा वापर व्यसनाकरीता होऊ नये. गडाचे पावित्र्य जपले जावे या उद्देशाने हे सुरक्षा द्वार गडाच्या प्रवेश मार्गात बसविण्यात आले आहे.