नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबई – भारताची राजधानी दिल्लीसह उत्तरभारतामध्ये थंडीत वाढ झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे राज्यातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून हवेतील गारवा थोडा कमी झाला असून तापमान वाढल्याचे जाणवू लागले होते. पण येत्या दोन दिवसांत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचीही हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे १०.२ अंश सेल्सियसच्या खाली घसरले आहे.