मुंबई – राज्यात जुलै महिन्यात पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत पूरग्रस्तांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
आजच्या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार संजय कुटे यांनी यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती सभागृहात दिली. तर विरोधकांमधून देखील नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी पूरग्रस्त नागरिकांबाबत आणि ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे, यांच्याबाबत नेमका निर्णय घेणार हे सांगावे, अशी मागणी केली होती.
विरोधकांनी केलेल्या मागणीवर निवेदन सादर करताना अजित पवार यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा करत सांगितले की, ज्या लोकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते, अशा लोकांना सध्याच्या दराने 5 हजार रुपये सानुग्रह देण्यात येणार होते. परंतु राज्य सरकारने हे सानुग्रह 10 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असेल अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक विभागाकडून शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल.
याशिवाय, ज्या दुकानांचे पुरामुळे नुकसान झाले आहे, अशा अधिकृत असणाऱ्या दुकानधारकांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार, तर अधिकृत टपरीधारकांना 10 हजार देण्यात येतील, अशा घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात वीज पडून मृत्यू झालेल्या लोकांना उद्यापर्यंत मदत येणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांच्याकडून देण्यात आली.
राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी राज्य सरकारच्या वतीने अजित पवार यांनी सांगितले. चंद्रपूर आणि इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून त्या सर्व ठिकाणी शासन लक्ष ठेवून आहे. तर ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणांची गरज अशा शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शासन त्यांना मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
– घरामध्ये पुराचे पाणी शिरल्यास 10 हजार रुपये
– दुकानांचे नुकसान झाल्यास 50 हजार रुपये
– अधिकृत टपरीधारकांना 10 हजार
– पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाइकांना 4 लाख रुपये