दुकाने बंद असूनही दुप्पट दराने होत आहे दारू विक्री
जामखेड – संचारबंदी असली, तरी जामखेड तालुक्यात सर्व प्रकारच्या दारूची चोरीछुपे विक्री होत आहे. त्यामुळे तळीरामांची चंगळ होत आहे. मात्र दारूची दुकाने बंद असताना दारू येते कुठून? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जामखेड येथेही लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे बिअरबार, देशी दारूची दुकाने, हॉटेल्स बंद असले, तरी गावातील काही ठिकाणी दिवसभर तळीरामांच्या झुंडी पहावयास मिळतात. याविषयी माहिती घेतली असता, गावातून देशी-विदेशी दारू, बिअरची तब्बल तीन पट जास्तीचे भावाने विक्री होत असल्याचे समजले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी देशी दारूच्या बाटल्यांचे एक खोके पूर्वी 2500 रुपयांना मिळायचे, आता ते 4 हजार रुपयांना मिळतो. विदेशी दारूचे दरही तिपटीने वाढले. तर प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये 10 रुपयांत मिळणारी गावठी दारू चक्क 50 रुपयांत विकली जात आहे. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असली, तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.