येरवडा – येरवडा येथील भाजी मंडई येथे नियमीत स्वच्छता केली जात नसल्याने बाजारात कचरा पडून असतो. भाजी विक्री करणाऱ्या ठिकाणी कचरा साचल्याने तसेच ओला कचरा असल्याने बाजारात मोठी दुर्गंधी सुटते. याचा त्रास भाजी विक्रेते तसेच ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. महापालिका, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मंडई विभाग यांना याबाबत सातत्याने कळवूनही भाजी मंडईच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने भाजी विक्रेते तसेच ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजी मंडईतील कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, येथे रोजच्या रोज कचरा उचलला जात नाही, उचलला तरी सर्वच ठिकाणचा कचरा न उचलता काही ठिकाणी तो तसाच ठेवला जातो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती आजी-माजी लोकप्रतिनिधींकडेही दिलेली असताना महापालिकेच्या कामकाजात काहीच फरक पडला नाही.
“सौ. शीला राज साळवे भाजी मंडई’ येथे परवानाधारक विक्रेत्यांसाठी भाजी मंडई बांधण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून महापालिका महिन्याला भाडेही आकारते. मात्र, आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेक विक्रेते भाजी मंडईतील गाळे सोडून रस्त्यावर व्यवसाय करतात. अनेक गाळे मोकळे असल्यामुळे कोठेही कचरा टाकला जातो. यातून या मंडईचे विद्रुपीकरण होत असून महापालिकेने दररोज कचरा उचलावा तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मोकळ्या गाळ्यांचा असाही वापर…
भाजी मंडईतील अनेक गाळे मोकळे अशा गाळ्यांचा वापर पुरसरातील नागरिक जुगार खेळणे, दारू पिण्यासाठी करतात. दिवसाढवळ्या येथे दारूचे अड्डे बसतात यातून अनेकदा भांडणेही होतात. यामुळे भाजी मंडईमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असते. याबाबत संबंधित लोकांना विरोध केला अथवा तक्रार केल्यास रात्रीच्या वेळी भाजीच्या गाड्यांची तोडफोड केली जाते. यामुळे यांच्याविरोधात कोणीही तक्रार करीत नाही.पोलिसांनी येथे गस्त घालावी अशी, मागणी होत आहे.