हिंजवडी – आयटी सेक्टर म्हणून सर्वत्र नावाजलेल्या हिंजवडी आयटीपार्कच्या रस्त्यांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. आयटीतील मुख्य रस्त्यांच्या पदपथांवर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. एमआयडीसीने तयार केलेले फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पथारीवाल्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अतिक्रमाणावर कारवाई करण्याचे धाडस एमआयडीसी प्रशासन का करत नाही असा सवाल आयटीयन्स प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रगतिपथावर असल्याने या कामाकरिता मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आल्याने आयटीनगरीचे रस्ते अरुंद झाले आहेत. करोना संकटानंतर आता काही आयटी कंपन्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने हिंजवडीची रहदारी पुन्हा वाढली आहे. मेट्रोमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांच्या फुटपाथवर भाजीवाले, फळविक्रेते, ज्यूस सेंटर व काही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या अशा अनेकांनी गर्दी केली आहे.
या पथारीवाल्यांकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. व्यावसायिकांकडून फुटपाथ गिळंकृत झाल्याने पायी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यातील वाहनांना भेदून पादचाऱ्यांना वाट काढावी लागते. त्यामुळे अनेकदा पादचाऱ्यांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
एमआयडीसीकडे सद्यःस्थितीत यंत्रणाच नाही
एमआयडीसी हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी 24 तास ऑनड्युटी कार्यरत असणारे कंत्राटदार नियुक्त केले जातात. अतिक्रमणे हटविण्याचे टेंडर दिले जाते. मात्र, या टेंडरची मुदत संपल्याने सद्यःस्थितीत एमआयडीसीकडे अतिक्रमण हटविण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. टेंडर पास झाल्यानंतर तत्काळ अतिक्रमण हटविण्यात येईल असे कनिष्ठ अभियंता प्रताप शिंदे यांनी सांगितले.