मुंबई : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अख्तर यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून त्यांना आव्हान दिले आहे.
जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी अंतरंग मात्र कट्टरवादीच आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बेशरमपणा @Javedakhtarjadu pic.twitter.com/cIiaWynqoV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 4, 2021
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे म्हटले आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केले असून हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
“आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.