मुंबई – कोरोनाच्या संकटावर मात करताना ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने मुंबईत विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पाच रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आज होत आहे. अशा पद्धतीने सर्वजण एकत्र आलो तर आपण कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई आणि लाटांचा कायमचा संबंध आहे. एक लाट गेली की दुसऱ्याची तयारी करावी लागते. कोरोना काळातही सर्वांनीच युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम केले. कोरोना काळात मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले. पण हे श्रेय माझे नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे अशा शब्दात त्यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले. मुंबईत अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद आहे, असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.
ऑक्सिजनअभावी मुंबईतील सुमारे 150 रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्या सुमारास राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने आज नवीन पाच संयंत्रे सुरू झाली आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करणारे मंत्री आदित्य ठाकरे, संबंधित सर्व यंत्रणांसह सीएसआर निधीतून मदत केलेल्या कंपन्यांचेही आभार मानले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याऐवजी आपले काम बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.