रखडलेली कामे पूर्ण करण्यास मार्चपर्यंतची “डेडलाईन’
पिंपरी – शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतरही शहरातील पाणीटंचाई कायम आहे. यावरून सत्ताधारी आणि प्रशासन टीकेचे धनी ठरू लागले आहेत. पाणी पुरवठ्यावरून महापौर माई ढोरे यांनी गुरुवारी (दि. 5) घेतलेल्या बैठकीत संबधित अधिकारी व ठेकेदारांवर संताप व्यक्त केला. तसेच, पाणीपुरवठ्याची कामे कोणी अडविल्यास महापालिका वकिलांनी थेट पोलिसांत तक्रार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शहरात समसमान पाणीपुरवठ्याबाबत महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर ही बैठक झाली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक संदीप कस्पटे, ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, रवींद्र पवार, दत्तात्रय रामुगडे, संदेश चव्हाण यांच्यासह ठेकेदार, सल्लागार उपस्थित होते.
सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने पाणीपुरवठा विभागाने शहरात नागरिकांना दुप्पट पाणीपुरवठा करावा. जेणेकरून तक्रारी येणार नाहीत. पाण्याच्या कामांची अडवणूक झाल्यास महापालिका वकिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी. त्याची माहिती फक्त पाणीपुरवठा विभागालाच द्यावी, अशा सूचना दिल्या. 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या 40 टक्के भागाचे पहिल्या टप्प्यातील काम रखडले आहे. या रखडलेल्या कामांवरून बैठकीमध्ये ठेकेदारांना विचारणा करण्यात आली. ठेकेदार व अधिकाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी 1 मार्चपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.