– पिण्याच्या पाण्याबरोबरच पिकांनाही फटका
वडापुरी – पुणे-सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाच्या (यशवंत सागर) पाणीपातळीत कमालीची घट झाली असून परिणामी, इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या शेतपिकांनाही फटका बसणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीचा पाऊस काहीसा समाधानकारक झाल्यामुळे उजनी धरण प्लसमध्ये आले होते. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात ६० टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरणासोबत भीमा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. एप्रिल, मे महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उजनी धरण हे दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, कर्जत, माढा व करमाळा या तालुक्यांच्या नदीकाठच्या गावांना वरदान ठरले आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधील पाण्यामुळे सिंचनाखाली असणारे क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम झाला. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना आर्थिक सुबत्ता आली. परंतु, या वर्षी या भागात पाऊस समाधानकारक न झाल्याने उजनी धरण पूर्णक्षमतेने भरलेच नाही. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार असल्याचे जाणवू लागले आहे.
भीमा नदीची सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता नदीपात्र कोरडे पडले आहे. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव, भांडगाव, अवसरी बेडसिंगे, बाभुळगाव, वडापुरी सुरवड, वकील वस्ती या भीमा नदी पात्रावर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच चाऱ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
वीज मोटार चोरीचे प्रमाण वाढले
भीमा नदी पात्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने विद्युत मोटर व साहित्य चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहे.
नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न हवेत
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून नेतेमंडळी सभा व कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.