संघर्ष समितीचा इशारा; बेळगावमधून मोटारसायकल रॅलीने प्रारंभ
सांगली – अब्जावधी रुपयांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी दि. 13 डिसेंबरला कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीकडून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या “आशीर्वादा’ने त्यांच्या समर्थकांनी पश्चिम महाराष्ट्रात कडकनाथ स्कीमखाली कोट्यवधींचा अपहार केला.
या संदर्भात जनजागृतीसाठी दि. 9 डिसेंबरपासून बेळगावपासून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. 10 तारखेला कोल्हापूर, 11 तारखेला सातारा आणि 12 डिसेंबरला पुण्यात मोर्चा पोहोचणार आहे. दि. 13 रोजी मुंबईत विधानभवनावर मोर्चा धडकेल. याची राज्य शासनाने त्वरित दखल न घेतल्यास अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कडकनाथच्या नावावर फसवणूक झालेले शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महारयत ऍग्रो कंपनीने सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. महायुती सरकारच्या काळात या प्रकरणाची राजकीय दबावामुळे दखल घेतली गेली नाही. अनेक शहरात या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही, असा आरोप समितीकडून करण्यात आला. राज्यातील नव्या ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड केले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातदेखील ही योजना सुरू होती. सुरुवातीला 75 हजार रुपये गुंतवावे लागत होते. पक्ष्यांसाठी लागणारा खाद्यपुरवठाही त्या कंपनीकडून केला जात होता.कोंबड्या आणि अंडीसुध्दा हीच कंपनी ठरावीक दराने विकत घेत होती. यामधून शेतकऱ्यांना एका वर्षात सुमारे तीन लाख मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सांगली, कोल्हापूरसह पाच राज्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांची लूट झाली आहे. ज्यावेळी गुंतवणूकदारांना परतावा मिळणार होता, त्याच वेळी या कंपनी बंद करून संचालक फरारी झाले आहेत.