मुंबई – शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा या प्रमुख मागणीसह बंड पुकारले आहे. शिंदे यांच्या या बंडाला सेनेच्या बहुतांश आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. पक्षात उभी आडवी फूट पडली असताना पक्षनेतृत्व आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. याचाच भाग म्हणून शिंदेंसह आपल्याच 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे.
सेनेची ही मागणी मान्य झाल्यास पक्षाची विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या कमी होईल. परिणामी सध्या 53 आमदार संख्या असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा महाविकास आघाडीतील सगळ्यांत मोठा पक्ष ठरेल.
महाविकास आघाडी स्थापन करत असताना ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त होईल. मात्र उद्धव ठाकरेंना खाली बसवून राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता देण्याच्या निर्णयाला जर सर्वोच्च न्यायालयातून स्टे मिळवण्यास अर्थात स्थगिती मिळवण्यात एकनाथ शिंदे गटाला यश आले तर अगोदर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लागू शकते. गेल्या दीडवर्षांपासून हे पद रिक्त आहे.
अशा स्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अगोदर अध्यक्ष निवडीचा विषय पुढे आणू शकतात. जर एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तर सरकार पडणार. मात्र त्यासाठी विधानसभेतच मतदानाने सरकार अल्पमतात असल्याचे सिध्द करावे लागेल. आता आपल्याकडे 123 आकडा असल्याचा भाजपचा दावा आहे. मतदानाच्या वेळी तो वाढूही शकतो.