मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, केंद्रातील भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ नावाच्या आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. पण, जर का आज लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा एक सर्वे समोर आला आहे. ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘सीएनएक्स’ने हा सर्वे केला आहे.
सर्वेक्षणानुसार राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपाला २० जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपानंतर सर्वाधिक ११ जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळू शकतील. काँग्रेसला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३२ टक्के, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १६ टक्के, काँग्रेस १६ टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के आणि अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या ३ जागा कमी होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेला फक्त २ जागा मिळणार असून १० जागांचा फटका बसणार आहे. अजित पवारांना २ जागांचा फायदा, तर काँग्रेसच्या ८ जागा वाढणार आहेत. उद्धव ठाकरेंना ६ जागा जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या ४ ही जागा तशाच राहणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे.