भारतातील अंजू नावाची महिला आपली दोन मुले आणि नवरा अरविंदला सोडून पाकिस्तानात गेली आणि तेथे इस्लाम धर्म स्वीकारून तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाहशी निकाह केला. खैबर पख्तनुख्वा या ठिकाणी या दोघांनी निकाह केला आहे. निकाहाच्या आधी अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बदलून आता फातिमा असे ठेवले आहे. अंजुने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याने तिला एका पाकिस्तानी उद्योगपतीने कोट्यवधीची भेट दिली आहे. पाक स्टार ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मोहसिन खान अब्बासी असे या उद्योगपतीचे नाव आहे.
मोहसिन खान अब्बासी यांनी अंजूला घर बांधण्यासाठी जमीन आणि ५० हजार पाकिस्तानी रुपयांचा चेक भेट दिला आहे. याबाबत पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना मोहसिन खान अब्बासी म्हणाले की, “अंजू भारतातून पाकिस्तानात आली आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याने मला खूप आनंद झाला आहे. फातिमाच्या (अंजु) निर्णयाचं स्वागत करण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे. कोणतीही व्यक्ती त्यांचे ठिकाण बदलून दुसरीकडे जाते तेव्हा सर्वात मोठी अडचण घराची असते. सध्या आमचा एक प्रोजेक्ट सुरू आहे त्यात आम्ही फातिमाला जमीन देत आहोत. या प्रस्तावाला स्थानिक शासकीय कार्यालयातूनही मंजुरी मिळाली आहे. ही भेट खूप छोटी आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही हे केले आहे. आता फातिमा निश्चिंतपणे पाकिस्तानात स्वत:च्या घरात राहू शकते.”
नेमकं काय आहे प्रकरण ?
राजस्थानच्या भिवडी जिल्ह्यातील एक विवाहित भारतीय अंजू नावाची महिला पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने तिच्या भिवडी येथील घरातून निघून गेली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या माध्यमातून तिची पाकिस्तानमधील नसरुल्लाह नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. त्यानंतर अंजु दोन मुले आणि पतीला सोडून लाहोरला गेली. पाकिस्तानात आपल्या प्रियकाराला भेटायला गेलेल्या अंजूने तिचा पती अरविंदसोबत व्हॉट्सअॅपवर संपर्क ठेवला होता.
लाहोरला गेल्यानंतर दोन तीन दिवसांत परत येणार असल्याचे तिने अरविंदला सांगितले होते. मात्र काही दिवसांनी अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून तिचा फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला. त्यांचे लग्नाचे प्री वेडिंग फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. तर दुसरीकडे, सीमा हैदर नावाची पाकिस्तानी महिला अवैध मार्गे प्रियकरासाठी भारतात आली होती. कोणत्याही कागदपत्राशिवाय तिने भारतात वास्तव्य केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.
सीमा आणि सचिनची भेट पबजी गेमदरम्यान झाली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले. देशाची बॉर्डर ओलांडून प्रियकराला भेटण्यासाठी सीमाने पाकिस्तानातील घर विकले. याच पैशातून सीमा नेपाळमार्गे भारतात येण्यात यशस्वी झाली. सचिनही आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नेपाळला गेला आणि काठमांडूमध्येच हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले. परंतु, अंजूकडे व्हिजा होता. त्यामुळे तिला पाकिस्तानात अधिकृत प्रवेश मिळाला. ती वाघामार्गे पाकिस्तानात आली आणि इस्लामाबादला गेली.