मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यापासून राजकारण तापलं आहे. धार्मिकस्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा आता देशभर गाजत असून आज पुन्हा राज ठाकरे औरंगाबादेत सभा घेत आहेत. त्यातच माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंवर सनसनीत टीका केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, ‘भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज व सहा तास हनुमान चालिसा पठण करेन. शेट्टी हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
भोंगे काढल्याने किंवा लावल्याने व हनुमान चालिसामुळे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज व सहा तास हनुमान चालिसा पठण करेन. तसेच आणखी कोणत्या देवाची आराधना करेन, असा टोला राजू शेट्टी यांनी भोंगे व हनुमान चालिसा प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना लगावला.
दरम्यान महागाई वाढली आहे. केंद्र व राज्य सरकार महागाई कमी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत, मोठ्या सभा घेतात. मग ते केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाच्या विरोधात का सभा का घेत नाहीत. सरकारच्या विरोधात रान का पेटवत नाहीत, असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.