नवी दिल्ली – कॉंग्रेसचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे असत्याचा भडीमार आहे. अनेक दशके देशात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने याआधी जाहीरनाम्यांमध्ये दिलेली कुठलीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे टीकास्त्र भाजपने सोडले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
कॉंग्रेसने जाहीरनाम्याला न्यायपत्र असे शीर्षक दिले आहे. त्याचा अर्थ याआधी देशात ५५ ते ६० वर्षे सत्तेत असताना अन्याय केल्याची कबुली त्या पक्षाने दिली आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आता पुन्हा सत्ता मिळाल्यास चमत्कार करण्याचे आश्वासन तो पक्ष देत आहे, अशी खिल्ली त्यांनी पत्रकारांशी बोलताना उडवली.
सत्तेत असताना कॉंग्रेसने अर्थव्यवस्था, उद्योग, लष्कर, सुरक्षा आणि तरूणांना न्याय दिला नाही. देशाची सांस्कृतिक प्रतिष्ठा, देशाचा सामाजिक सलोखा आणि देशाची क्षमता आदींना न्याय न देणारा पक्ष आता न्यायाचे आश्वासन देत आहे.
आता संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि मतदारांची दिशाभूल करण्यासाठी कॉंग्रेसने जाहीरनामा जारी केला आहे, असा आरोप त्रिवेदी यांनी केला.