कर्जत – सत्ता आल्यास बारामतीप्रमाणेच कर्जत-जामखेडचा विकास करू. तसेच तीन महिन्यांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी अंकुश काकडे, घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, दत्ता वारे, राजेंद्र गुंड, मधुकर राळेभात, सुनंदा पवार, काका तापकीर, डॉ. राजेंद्र तोरडमल, दीपक शिंदे, नितीन धांडे, हृषीकेश धांडे, अक्षय शिंदे, श्याम कानगुडे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला.
रोहित पवार म्हणाले, स्वतःला सालकऱ्याचा मुलगा म्हणणारे पालकमंत्री मला मालकाची उपमा देतात. होय मी मालकच आहे. मात्र जनतेच्या प्रेमाचा मालक आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी मतदारसंघात फिरतोय. मात्र जनतेचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. या गावागावांत फलक लावण्यातच विकास दिसला. आगामी काही काळात जातीपातीचे राजकारण केले जाईल. कार्यकर्त्यांना धमकावण्याचे उद्योग कराल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. राष्ट्रवादीने मोठे शक्तिप्रदर्शन केले.