मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्दयावरून विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावा केला आहे. “कन्नड वेदिका संघटनेनं महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे”, असे राऊत यांनी म्हटले आहे. यावरून मनसेने आता संजय राऊतांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
गुरुवारी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी आपल्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संघटनेने दिल्याचा दावाही त्यांनी केला. “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडच्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू म्हणतात, यावर भाजपाने बोलावं”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावरून आता मनसेनं संजय राऊतांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. “सौ दाऊद ज्यांना घाबरतात, त्यांना धमकी आल्याचं कळतंय. काळजी नका करू. सरकार संरक्षण देईलच. पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील”, असे गजानन काळेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या ट्वीटमध्ये गजानन काळेंनी संजय राऊतांना खरच धमकी आली आहे की नाही, यासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. “चर्चेत राहण्यासाठी अशा काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली आहे का हे सरकारने पहावे”, अशी मागणी काळेंनी ट्वीटमधून केली आहे.