नवी दिल्ली :- भारत यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. संघाच्या घोषणेसाठी ICC कडून 5 सप्टेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती आणि त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)आणि निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र 27 सप्टेंबरपर्यंत या संघात बदल करता येतील. कर्णधार रोहित शर्मासोबतच उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्यावर टीम इंडियाला (Team India) 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे.
रोहित आणि शुभमन गिल हे भारतीय संघात सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार आहेत. इशान किशन बॅकअप सलामीवीर असेल. मात्र, त्याला मधल्या फळीतही संधी मिळू शकते. त्याचबरोबर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल भारतीय संघाची मधली फळी सांभाळतील. सूर्यकुमार यादवचाही संघात समावेश आहे, मात्र संघातील कोणी खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच त्याच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळूू शकतेे.
भारतासमोर यष्टिरक्षकासाठी दोन पर्याय आहेत. त्याची जबाबदारी राहुल आणि ईशानवर असेल. अष्टपैलू म्हणून चार खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील तर फिरकी विभागाची धुरा कुलदीप यादव, जडेजा आणि अक्षर पटेल सांभाळतील.
भारतीय संघ खालीलप्रमाणे –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
भारत आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. 2019 प्रमाणे यावेळीही एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. सर्व 10 संघ आमनेसामने असतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.