मुंबई :- भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. मात्र, यावेळी मायदेशात खेळण्याचा तसेच आपल्या मनाला वाटेल तशा खेळपट्ट्या तयार करण्याच्या बीसीसीआयच्या मनसुब्यांना आयसीसीकडून दणका बसणार आहे.
नुकतीच 23 ऑगस्टला आयसीसीची एक बैठक पार पडली व त्यात आयसीसीचे चीफ क्युरेटर अँडी एटकिंसन यांनी सर्व क्युरेटर्संना सराव सामना असो की मुख्य स्पर्धेतील सामना खेळपट्ट्या तयार करताना बीसीसीआयच्या दबावात न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरच्या मैदानाचा लाभ होईल, अशा खेळपट्ट्या तयार न करता स्पोर्टी विकेट तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
गुजरातचे नरेंद्र मोदी स्टेडियम, कोलकात्याचे ईडन गार्डन्स, हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, लखनौचे इकाना क्रिकेट स्टेडियम, चेन्नई एम. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईचेच एम. चिन्नस्वामी स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, धर्मशाळा मैदान, मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे येथील एम.सी.ए. स्टेडियम या दहा मैदानांवर या स्पर्धेचे सामने होणार असून प्रत्येक ठिकाणच्या खेळपट्टीवर आयसीसीचे क्युरेटर्स नजर ठेवणार आहेत. या स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे.
प्रत्येक खेळपट्टी वेगळी…
भारतात ही स्पर्धा होत असली तरीही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माती आहे. त्याचा परिणाम खेळपट्ट्यांवर दिसतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकसारखी खेळपट्टी तयार करणे शक्य नसते. त्यामुळेच प्रत्येक ठिकाणची खेळपट्टी वेगळी असेल. मात्र, ही खेळपट्टी तयार करताना दोन्ही संघांना समान लाभ होईल व दोन्ही बाजूची एकूण 100 षटके खेळपट्टी चांगली राहील, अशीच तयार करण्याच्या सूचना आयसीसीने दिल्या आहेत.