नवी दिल्ली – राजस्थानमधील कोटा येथे रविवारी चार तासांत नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर गेल्या सात महिन्यांतच कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यात लातूरमधील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे.
लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (17 वर्षे) हा विद्यार्थी कोटा येथे शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अविष्कारचे आई-वडील हे दोघेही शिक्षक असून ते अहमदपूर येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद येथे शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचे कोटामधून शिक्षण पूर्ण झाले होते. त्याचे यश बघून अविष्कारलाही कोटा येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.
कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्याने वर्गात बसूनच परीक्षा दिली होती. परीक्षा संपताच तो बाहेर आला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली. तो सहाव्या मजल्यावरून सुमारे 70 फूट खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि डोळ्यांना तसंच, शरीरावर गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सध्या अविष्कारच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कासले याच्या मृत्यूच्या चार तासांनंतर बिहारच्या रोहतास जिल्ह्यात राहणारा आदर्श राजने भाड्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. गेल्या एक वर्षापासून तो कोटा येथील कोचिंग सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या बहिणीसह तो कोटा येथे एका घरात राहात होता.