हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण
इंदापूर – “मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतो आहे. तिथं समाधानी आहे, तरीदेखील शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा चुकीच्या रंगत आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही,’ अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथील निवासस्थानी गुरुवारी (दि. 6) पाटील यांच्याशी थेट संवाद साधला असता ते बोलत होते. “पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काही वेळ चर्चा झाली. माझ्यासोबत काही मंत्री व सहकारी उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांची झालेली भेट हे शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात अजिबात नव्हती.
काही माध्यमातून हर्षवर्धन पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असा गवगवा करण्यात आला; मात्र मी भाजपचे काम करीत आहे यामध्ये मिळणारे समाधान वेगळे आहे. भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतो आहे. म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.’
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व आमचे जुने स्नेह आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसेच सहकारी साखर कारखान्यांबाबत त्यांच्यासोबत चर्चा सातत्याने होत असते; मात्र या गोष्टीचा विपर्यास वेगळ्या मार्गाने होतो,’अशीही खंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली.