मुंबई – अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधीपासून सत्ताधारी शिवसेनेतील इच्छुक नेत्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अश्यातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील एक मोठं विधान केलं असून त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले की, “अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज आहे. असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे.
हनुमानाची शपथ घेऊन सांगतो सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. पण विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण हे सरकार अस्थिर आहे. सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. जनता यांना धडा शिकवेल’. असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
तसेच यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या नावाभोवती असणाऱ्या मंत्रिपदाच्या चर्चा यावरही भाष्य केलं आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, “बच्चू कडू म्हणाले त्यानुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीमधील वातावरण खराब आहे. बच्चू कडू प्रामाणिक नेते आहेत. ते स्वाभिमानी पण आहेत. पण त्यांचा वापर करून घेतला जात आहे. असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांच्या झालेल्या कोंडीवर भाष्य केलंय.
बच्चू कडू पत्रकार परिषदेत काय म्हणाले…
“सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही, पण मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे.
त्यामुळे मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं 17 जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर 18 जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले.