मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला. अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांमध्येही नाराजी असल्याचे आले दिसून येत आहे. याविषयी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले,’आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. शिंदे साहेबामुळेच आम्ही खरं तर उद्धव साहेबांना सोडून शिंदेंसोबत गेलो आता शिंदे साहेब भाजपसोबत जाणार हे माहीत नव्हतं. पण ते गेले.. मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.’ असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्रात अद्यापही मंत्री पद न मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांनी आता थेट गोव्याकडे आपलं लक्ष वळवलं आहे. गोवा (Goa) राज्यात आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्याची त्यांनी सुरुवात केली आहे.