Chhagan Bhujbal : राज्यात एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले असले तरी त्यांनी आता आरक्षणाच्या मुद्द्याव्ररून जिल्ह्यांतर्गत दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांचे आरक्षणाचे आंदोलन अधिक धारदार होत आहे. दरम्यान, या दौऱ्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यात छगन भुजबळांना मराठ्यांनी मदत केली असे म्हणत त्यांनी आता मराठ्यांच्या बाजूने उभं राहावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला आणि त्यांनी केलेल्या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपावर छगन भुजबळ यांनी,“मराठा समाजाला आरक्षण देण्याला मी विरोध केलाच नाहीय. पण ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. पावणेचारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून त्यांना (मराठा) वेगळं आरक्षण द्या, असं माझं मत आहे.”असे म्हटले आहे.
त्यासोबतच “पण हे माझं एकट्याचं मत नाही. सगळीच मंडळी त्याच मताची आहेत. मी काही एकटा त्या मताचा नाही. पण मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा”, असा इशाराही भुजबळांनी यावेळी दिला.