बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा आपल्या बहुरंगी अभिनयाबाबत ओळखला जातो. विविध चढउतारांनी भरलेल्या कारकिर्दीमध्ये संजूबाबाने अनेक धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून ओळख दिली ती “वास्तव’ने असे संजय दत्त मानतो.
नुकतीच या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ट्विटर अकौंटवर संजय दत्तने आपल्या मनातील विचार व्यक्त केले आहेत. त्यामध्ये संजूबाबा म्हणतो, की “वास्तव’ला दोन दशके पूर्ण झाल्याचा आनंद मी साजरा करत आहे. हा एक असा चित्रपट होता ज्याने मला खऱ्या अर्थाने अभिनेता बनवलं.
महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मुंबईतील अंडरवर्ल्डच्या साम्राज्याचे सत्य उजागर करणारा होता. चित्रपटाची कहाणी काही अंशी अंडरवर्ल्ड गॅंगस्टर छोटा राजनच्या जीवनाशी मिळतीजुळती होती.
या चित्रपटात नम्रता शिरोडकर, संजय नार्वेकर, मोहनीश बहल, रिमा लागू आणि शिवाजी साटम यांच्या भूमिका होत्या. संजूबाबा म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच या चित्रपटातील त्याचा अभिनय लाजवाब होता!