मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आमच्याकडे जास्त आमदार, खासदार असल्याचे सांगत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे असा दावा शिंदे यांनी केला. न्यायालयानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचले. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्हा दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे सांगत चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निवडणूक आयोगाकडून दोन्हा गटाला सांगण्यात आले.
दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सूचवली आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लाईव्हद्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेची संपूर्ण वाटचाल सांगितली. यावेळी ते भावूक झाले होते.
शिवसेना पक्ष स्थापनेबाबत सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्यावेळेला फोडला. ती वेळ सकाळची नऊ साडे नऊची होती. घरचे आम्ही सगळी लोकं होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यांमुळे अंग शहारलं होतं. पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्यानी एवढं चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती.
म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं. मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीयेत उद्वेगाचे आहेत.
दरम्यान, यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे. अशी ही उलट्या काळजाची माणसं आहेत, ज्याने हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यांना (एकनाथ शिंदे) आनंदाने उकळ्या फुटत असतील. जनता जनार्धन तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, त्यांना (भाजप) जास्त आनंद होत असेल की, बघा आम्ही करून दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही ते आम्ही त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून आम्ही करून दाखवलं. कशी ही माणसं? काय मिळवलंत तुम्ही? ज्या शिवसेनेनी मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेनी मराठी मनं पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली शिवसेनेचा तुम्ही हात कापायला निघालात. ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलंत. काय मिळणार आहे तुम्हाला? आज नाही म्हटलं तरी मराठी माणसाची एक भक्कम एकजूट शिवसेनेने केलेली ती एकजूट तुम्ही फोडायला निघालात.
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –