परप्रांतीय मच्छिमारांचा प्रताप : स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
पळसदेव -उजनी धरणात सध्या मासे मिळत नसल्यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या मत्स्य व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याला प्रमुख कारण म्हणजे उजनीतील लहान मत्स्यबीजांची मोठ्या प्रमाणात शिकार होत आहे. त्यामुळे मासे मोठे होण्याचा प्रश्नच उरत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून उजनी धरण परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात उजनी काठावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मच्छिमारांनी बस्तान बसवले आहे. हे मच्छिमार मासेमारीच्या नावाखाली येऊन नदीतून लहान लहान मत्स्यबीज पकडून उन्हात वाळवून त्यांची परराज्यात अथवा जिल्ह्यात विक्री करीत आहेत.
लहान लहान मत्स्यबीज पकडल्यामुळे उजनीतून अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रोहू, कटला, मरळ यांसारखे मासे आता उजनीत अगदी दुर्मिळ झाले आहेत. सध्या केवळ चिलापी जातीचे मासे काही प्रमाणात सापडत आहेत. मात्र त्या देखील जातीचे लहान मत्स्यबीज पकडल्यामुळे सध्या एके काळी माशांनी संपन्न असलेले उजनीत आता माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. दरवर्षी उजनीत शासनाकडून मस्त्यबीज सोडले जाते मात्र त्याचे प्रमाण एकदम कमी आहे.
त्यातही मोठी अनियमितता आहे. त्यामुळे उजनीत नेमके मासे येणार तरी कुठून असा मोठा प्रश्न स्थानिक मासेमारांसमोर उभा राहिला आहे. उजनीतील लहान मस्त्यबीज पकडणे व त्याची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश संबंधित आडतदारांना देण्यात आले आहेत, या आदेशालाही परप्रांतीय, स्थानिकांकडून हरताळ फासला जात आहे.
मात्र बेकायदेशीर रित्या पकडलेले हे मत्स्यबीज परप्रांतीयांकडून स्थानिक बाजारपेठेत न विकता ते इतर ठिकाणी घेऊन जाऊन विक्री करण्यात येत आहेत. यामुळे अनेकदा स्थानिक मच्छिमार व परराज्यातील मच्छिमार यांच्यामध्ये वाद झाले आहेत. भविष्यकाळात यातून मोठा घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र या बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या धंद्यावर प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हा काळा कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
रोजंदारीवर काम करण्याची वेळ-
गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातीलच काही मच्छिमारांनी अधिक नफा मिळविण्याच्या हेतून आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून काही मच्छीमार आणून बेकायदेशीररित्या लहान लहान मत्स्यबीज पकडून मारण्याचा सपाटा लावला आहे. मच्छीमारांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे. अनेक स्थानिकांनी लोणीदेवकर एमआयडीसीमध्ये अगदी रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
मत्स्यबीज पकडणाऱ्यांवर कारवाई करा-
उजनीतील लहान मासे पाण्यातील प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत करत आहेत. मात्र त्यांची संख्या एकदम कमी झाल्याने पाण्याचे प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उजनीतील लहान मत्स्यबीज पकडण्यावर बंदी घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, उजनीत आणखी नवीन मत्स्यबीज सोडण्याची शासनाने तरतूद करावी, अशी मागणी या भागातील मच्छिमार करत आहेत.