नवी दिल्ली : राहुल गांधी हेच कॉग्रेस मधील सर्वमान्य नेते असल्याने त्यांनीच आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा स्वीकारण्याची हीच वेळ आहे, त्यांनी ती स्वीकारावी असे मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी म्हटले आहे.
आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की कॉंग्रेसकडे सर्वांना मान्य होईल असा दुसरा चेहरा नाही. राहुल गांधी यांचे इरादे स्पष्ट आणि उदात्त आहेत, त्यांनी सरकार व पंतप्रधान मोदींच्या विरोधात सातत्याने आक्रमक भुमिका घेतली आहे.
कॉंग्रेसचे नेतृत्व आता नव्या नेत्याकडे जाण्याची गरज निर्माण झाली असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी शक्य तितक्या लवकर पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यास ते पक्षासाठीही चांगले होणार आहे.
त्यांच्यातील नेतृत्व गूण या आधीच सिद्ध झाले आहेत. कॉंग्रेसच्या पुनर्रंबांधणीसाठी त्यांनी आता पुढे येऊन ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
देशाला आज केवळ उत्तम वक्तृत्व असलेल्या नेत्याची नव्हे तर उत्तम मन असलेल्या कर्तृत्ववान नेत्याची गरज आहे असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
एक नेता केवळ चांगले बोलतो म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहण्याची किंमत आज देश मोजतो आहे, मोदींची भाषणे ऐकून लोक त्यांना भुलले असतील पण आज देशाची सर्वच क्षेत्रातील झालेली पिछेहाट पाहिल्यानंतर आता केवळ चांगली भाषणे देणाऱ्या नेत्याचा उपयोग नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.