औंध, दि. 10 (प्रतिनिधी) -औंध, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये आनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्तांनी उत्साहात आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. औंध येथे गणपती विसर्जन घाटावर परिसरातील इतर घाटांपेक्षा सर्वात जास्त गर्दी होती. परंतु, प्रशासनाने केलेली अपुरी व्यवस्था व गणेश विसर्जन घाटावरील चिखल यामुळे भक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागला. औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण 23,699 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्यातील एकूण 21,688 मूर्ती हौदात विसर्जित करण्यात आल्या. तर फिरत्या हौदंमध्ये 1721 मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्या.
औंध येथील गणेश विसर्जनापूर्वीच नागरिकांनी विसर्जन घाट स्वच्छ करण्याची मागणी क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होते. तसेच तेथे नेमण्यात आलेल्या जीव रक्षकांची संख्याही कमी असल्याचे नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यानंतरही कार्यालयाकडून अपूरी व्यवस्थाच करण्यात आली. परिसरातील कोळी बांधवांनी केलेल्या मदतीमुळे औंध विसर्जन घाटावर सुरळीतपणे गणेश विसर्जन पार पडले.
औंध तालीम संघातर्फे भैरवनाथ मंदिर शेजारी ठेवण्यात आलेल्या विसर्जन हौदांमध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जित केल्या. बाणेर बालेवाडी परिसरामध्येही पालिकेने ठेवलेल्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पालिकेने विविध ठिकाणी फिरते हौद ठेवले होते, परंतु, अशा फिरत्या हौदांना नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.