फुरसुंगी – “पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन व प्रक्रियेसाठी महापालिका दरवर्षी 200 कोटी रुपये खर्च करते. पण, तरीही कचरा समस्या सुटत नाही. फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांचा विरोध असूनही कचरा डेपोत 200 मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली?
यासाठी पालकमंत्र्यांबरोबर लवकरच संयुक्त बैठक घेऊन माहिती घेण्यात येईल. कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,’अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोत उभारण्यात येत असलेल्या 200 मेट्रिक टन कचरा प्रक्रिया व बायोमायनिंग प्रकल्पाच्या कामाची पाहणी खासदार सुळे यांनी केली.यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, आमदार चेतन तुपे, नगरसेवक गणेश ढोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,कचरा डेपो संघर्ष समिती अध्यक्ष भगवान भाडळे, माजी उपसरपंच संजय हरपळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, रणजित रासकर, अर्चना कामठे, निता भाडळे, विजय भाडळे, अनंता भाडळे, डॉ. शंतनु जगदाळे, दिनकर हरपळे, चंद्रकांत हरपळे आदी उपस्थित होते.
यावेळी भगवान भाडळे म्हणाले, “राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या कचरा डेपोत डिसेंबर 2019 नंतर बायोमायनिंग प्रकल्प वगळता कोणताही नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारू नये, असे आदेश दिलेले आहेत.
तरीही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यास परवानगी दिलीच कशी?’आमदार तुपे म्हणाले, “कचरा वाहतुकीसाठी पूर्वी टनाला 300 रुपये दिले जात होते. सध्या ते 900 रुपये दिले जातात. कचरा प्रक्रिया करण्यासाठी पूर्वी टनाला 400 रुपये दिले जात होते सध्या 650 रुपये दिले जातात. एवढा खर्च करूनही कोणताही प्रकल्प सुरळीत सुरू नाही.
कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. सर्व कचरा मिश्र स्वरूपात येत आहे. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी झालीच पाहिजे.’ माजी उपसरपंच संजय हरपळे म्हणाले, “प्रकल्पाच्या नावाखाली सर्रास ओपन डंपिंग करून कचऱ्याचे डोंगर उभे केले जातात. परंतु आता आम्ही हे होऊ देणार नाही.’
तर, “एनजीटीने एप्रिल 2021 पर्यंत बायोमायनिंगचे काम पूर्ण करुन साइट क्लिअर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला मॉनिटरिंगचे निर्देश होते. परंतु मंडळाने ते
पाळले नाहीत. त्यांनीच नवीन प्रकल्पाला परवानगी दिली. आता यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार आहे, असे कचरा डेपोचे अभ्यासक दिलीप मेहता म्हणाले.
ग्रामस्थांचा विरोध डावलून पालिकेने येथे 200 मेट्रिक टन कचरा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. काहीही झाले, तरी या प्रकल्पात एकही कचरा गाडी येऊ देणार नाही. 30 वर्षे कचरा डेपोच्या नरकयातना आमचे नागरिक सहन करत आहेत. त्यामुळे यापुढे महापालिकेला नागरिकांच्या जीवाशी खेळू देणार नाही.
– गणेश ढोरे,स्थानिक नगरसेवक