मुंबई – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा जुलै महिन्याच्या सुरुवातीला रिक्त होणार असल्याने त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यसभेच्या या ६ जागांसाठी येत्या १० जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. राज्यातील रिक्त ६ जागांपैकी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी १ तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील असं मत पवार यांनी मांडल आहे.
“सहा जागा आहेत. कोट्याबाबत बोलायचे झाल्यास भाजप दोन जागा सहज जिंकू शकतो आणि त्यांना काही अतिरिक्त मतेही मिळतील. शिवसेनेला एक जागा मिळू शकते. पण त्यांच्याकडेही अतिरिक्त मते आहेत. राष्ट्रवादीला एक जागा सहज मिळू शकते आणि काही अतिरिक्त मते पक्षाकडे आहेत. काँग्रेस एक जागा जिंकू शकते त्यांच्याकडेही एक ते तीन अतिरिक्त मते आहेत.” असे गणित उपमुख्यमंत्री पवार यांनी मांडले.
महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपत आहे. त्यात पियुष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे (तिघेही भाजप), पी चिदंबरम (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि संजय राऊत (शिवसेना) यांचा समावेश आहे. चारही पक्षांनी अद्याप त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
शिवसेना दोन जागा लाढवणार?
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली असून यावेळी १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी. असे सांगितले.
दरम्यान, शिवसेनेने पक्षाला आपले दोन उमेदवार संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवायचे असल्याचे आधीच सांगितले आहे. तिन्ही सत्ताधारी पक्षांपैकी कोण किती जागा लढवणार याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांमधील चर्चेनंतर घेतला जाईल, असे प्रदेश काँग्रेसने बुधवारी सांगितले होते. यामुळे याबाबत काय निर्णय होतो याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
संभाजी राजे अपक्ष लढणार
राज्यसभा सदस्यपदाची निवडणूक संभाजी राजे अपक्ष लढवणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले आहे.