मुंबई – देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार असे सांगत सत्तेत आलेले मोदी सरकारच भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून 2016-17 या वर्षात 500 रुपयांच्या 8810.65 दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या. परंतु आरबीआयकडे 7250 दशलक्ष नोटा पोहचल्या. म्हणजेच 88 हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या 176 कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रासह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.
नाना पटोले म्हणाले, नाशिक, देवास आणि बंगळुरुच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक व देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून थेट रिझर्व्ह बॅंकेकडे जातात व नंतर बाजारात चलनात येतात, ही प्रक्रिया आहे. मग या नवीन 500 रुपयांच्या नोटा गायब कशा झाल्या? या कारखान्यात छापलेल्या नवीन 500 रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल 88 हजार कोटी रुपये गेले कुठे? हा गंभीर प्रश्न आहे, असे पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असे आधीच सांगितलेले आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर 500 व 1000 रुपयांच्या जुना नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा करण्यात आल्या होत्या. 1660 कोटी नोटा चलनात होत्या, पण रिझर्व्ह बॅंकेत या जुन्या नोटा जमा झाल्या, त्यावेळी 2 लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्या होत्या, अशी माहिती आहे. नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटा किती छापण्यात आल्या? रिझर्व्ह बॅंकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.