सातारा -चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसो दूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिकांच्या आशाही आता पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या विकासाचे नियोजन कसे होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहराजवळील हद्दीत आलेला हा परिसर विस्तीर्ण आहे. शाहूनगर, गोळीबार मैदान, आझादनगर चौक, शिवनेरी कॉलनी, माधुरी कॉलनी, जगतापवाडी, चार भिंती परिसर, गोडोलीचा साईबाबा मंदिर पिछाडी, दरे बुद्रुकपरिसर, विलासपूर ग्रामपंचायतीचा काही परिसर, करंजेचा काही परिसर, माजगावकर माळ झोपडपट्टी, गोडोलीच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत हा परिसर पसरलेला आहे. शाहूनगरचा काही भाग हा विलासपूर ग्रामपंचायतीत आहे. तर काही भाग शहरात; परंतु जो भाग दोन्हीकडे नाही, तो त्रिशंकू भाग विकास कामांपासून वंचित राहिलेला आहे.
या परिसरात टुमदार बंगले आणि मोठ्या अपार्टमेंट झाल्या असल्या तरी रस्त्यावरची वीज, कॉलन्यांमधील रस्ते, गटार, कचरा वाहून नेण्याची यंत्रणा अशा सुविधांची या परिसरात कमतरता आहे. हे लोक कर भरत नसल्याने पालिका अथवा जवळची ग्रामपंचायत त्यांना सुविधा देत नाही.
या त्रिशंकू भागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभाग करुन घ्यावा आणि येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात होती. या मागणीला आता मूर्त रुप प्राप्त झाले आहे.
शासनाच्या नगर विकास विभागाने सातारा शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर केल्याने शहरासह उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठी विकास कामे प्राधान्याने मार्गी लागतीलच. परंतु, रस्ते, गटारे, पाणी, वीज या मुलभूत सेवा प्राधान्यांने मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा
रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, ओढ्यांचे रुंदीकरण
घंटागाड्या, स्ट्रीट लाईट, घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्प
सुसज्ज रुग्णालय, बालोद्यान, क्रीडांगण विकास, झोपडपट्टी विकास
खुल्या व सार्वजनिक जागांचा विकास, शॉपिंग सेंटर
अजिंक्यतारा किल्ला हद्दवाढीत आल्याने पर्यटन विकासाला चालना
त्रिशंकू भागातील नागरिकांना घंटागाडी, ओढ्यांचे रुंदीकरण, रस्ता, पाणी यांसह अनेक समस्यांना आजही सामोरे जावे लागत आहे. या समस्या प्राधान्याने मार्गी लागणे गरजेचे आहे. हद्दवाढीमुळे नागरिकांच्या पालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
विशाल पवार, रिक्षाचालक