मुंबई – कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड येथील पूरस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता या मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून यावेळी केंद्र सरकार राज्याला नक्कीच मदत करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
आजचा सामनाचा अग्रलेख
कोकणात जगबुडी नावाची नदी आहे . त्या जगबुडीने अति रौद्ररूप धारण केले आहे . जगबुडी म्हणजे काय हे आज कोकणातील जनता अनुभवत आहे . ‘ निसर्ग ‘ वादळाच्या आपत्तीतून कोकण नुकतेच कोठे डोके वर काढीत होते तोच कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात व्हावा ही दुःखाचीच गोष्ट आहे .
परमेश्वराजवळ आता अशी प्रार्थना आहे की , आणखी किती कठोर परीक्षा घेणार आहेस ? आता यापेक्षा अधिक संकट त्याने महाराष्ट्रावर आणू नये . महाप्रलयाचे तडाखे महाराष्ट्राने अनेकदा पचवले , पण हे संकट जगबुडीसारखे आहे . सरकारने , मंत्र्यांनी , प्रशासनाने , राजकीय कार्यकर्त्यांनी या वेळी त्यांची अत्युच्च सेवा संकटग्रस्तांसाठी द्यावी !
महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटले आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. अशा तऱहेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई-ठाण्यावर पावसाने अवकृपा केली व त्यात तिसेक माणसे दरड कोसळून मरण पावली. पावसामुळे घरेदारे, गुरेढोरे, उद्योग-व्यवसाय वाहून गेला आहे. शेतीवाडी, फळबागांचे नुकसान झाले ते वेगळेच. बाजारपेठांत पाणी घुसल्याने तेथील व्यवहार बंद आहेत.
मुंबई-गोवा हायवे, कराड रोड बंद पडल्याने दळणवळण ठप्प झाले. लोकांच्या फक्त घरात पाणी शिरले असे नाही, तर घरांच्या छपरांपर्यंत पाणी पोचल्याने शेकडो लोक पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी सरकारला लष्कर, नौदलाची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही.
ही मोठीच आपत्ती आहे व लोकांच्या जीविताचे रक्षण करणे यालाच प्राधान्य द्यायला हवे. परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटल्याने लोक हवालदिल झाले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रावर पाऊस काळ बनून कोसळत आहे. कोरोनाच्या संकटाशी राज्य व जनता लढत असताना हे ओले संकट उभे ठाकले आहे. कालपर्यंत ज्या नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या त्या आता
धोक्याची पातळी ओलांडून
गावात, घरांत शिरल्या आहेत. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. 77 बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. सातारा अडचणीत आहे. कोयना भरून वाहत आहे. अमरावती, मेळघाट, नाशिकमध्ये पुराचेच भयावह चित्र आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातही पाणी शिरल्याने तेथे हाहाकार माजला असण्याची शक्यता आहे.
एकंदरीत महाराष्ट्रावर अस्मानी संकट पुन्हा एकदा कोसळले असून या पूरपरिस्थितीचा राजकीय आखाडा कोणी करू नये. ‘सरकार काय करते? इतका पाऊस पडत असताना सरकार झोपले होते काय? सरकारची मदत का पोहोचली नाही?’ असे प्रश्न कोणाला विचारायचेच असतील तर थोडी कळ काढावी. राज्य पाण्याखाली गेले आहे. राज्य पुराच्या प्रवाहाशी झुंज देत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांनी सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. केंद्राने तातडीने मदत देणे गरजेचे आहे.
लाखो लोक निराधार, बेघर, अस्तित्वहीन झाले. त्यांची घरेदारे, संसार वाहून गेले. त्यांना पुन्हा उभे करावे लागेल. त्यासाठी मोदी सरकारला पुढाकार घ्यावाच लागेल. आज परिस्थिती अशी आहे की, ठिकठिकाणी जनजीवन बंद पडले. रस्ते वाहतूक खड्डय़ात गेली आहे. लहान पूल, साकव प्रवाहात उखडून गेले आहेत. पावसाचे फक्त झोडपणे आणि दडपणेच चालले आहे. गावागावांत आक्रोश आणि किंकाळय़ाच ऐकू येत आहेत. हे सर्व केंद्र सरकारलाही गांभीर्यानेच घ्यावे लागेल. कोकणात जगबुडी नावाची नदी आहे. त्या जगबुडीने
अति रौद्ररूप धारण केले आहे. जगबुडी म्हणजे काय हे आज कोकणातील जनता अनुभवत आहे. याक्षणी पुरात अडकलेल्या लोकांची गरज काय आहे? त्यांना नौदलाच्या बोटी, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवायला हवे. त्यांच्या निवारा व जेवणाची सोय व्हायला हवी. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळायला हवी. कारण पाऊस थांबला की, नव्या आजारांचे घोंघावणे सुरू होईल.
आधीच कोरोना, त्यात नवे आजार येतील. त्यातून पूरग्रस्तांचा बचाव करणे गरजेचे आहे. आज कोकण रेल्वे बंद पडली आहे, तर अनेक ठिकाणी रेल्वेचे रूळ वाहून गेले आहेत. तिनेक वर्षांपूर्वी सांगलीत पुराचे पाणी घुसले होते. त्यापेक्षा भयंकर स्थिती या सगळय़ा भागांत दिसत आहेत. या परिस्थितीशी सामना करावाच लागेल. राज्यावर संकट आहे.
केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्राचे संकट हे देशावरचे संकट मानून मोदी सरकारने महाराष्ट्राला सढळ हस्ते मदत करावी, ही ‘मऱहाटी’ जनतेची अपेक्षा आहे. नक्की किती नुकसान झाले, प्राणहानी किती झाली याची कल्पना इतक्यात येणार नाही. ‘निसर्ग’ वादळाच्या आपत्तीतून कोकण नुकतेच कोठे डोके वर काढीत होते तोच कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात व्हावा ही दुःखाचीच गोष्ट आहे.
परमेश्वराजवळ आता अशी प्रार्थना आहे की, आणखी किती कठोर परीक्षा घेणार आहेस? आता यापेक्षा अधिक संकट त्याने महाराष्ट्रावर आणू नये. महाप्रलयाचे तडाखे महाराष्ट्राने अनेकदा पचवले, पण हे संकट जगबुडीसारखे आहे. सरकारने, मंत्र्यांनी, प्रशासनाने, राजकीय कार्यकर्त्यांनी या वेळी त्यांची अत्युच्च सेवा संकटग्रस्तांसाठी द्यावी!