मुंबई – महागाईचा दर वाढण्याची शक्यता असूनही रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात वाढ केली नाही. त्यामुळे उत्सवाच्या काळात घर विक्रीला चालना मिळेल, असे मत या क्षेत्राने व्यक्त केले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशभरात घर विक्री किमान 40 टक्क्यांनी वाढेल असा आमचा अंदाज आहे, असे बऱ्याच विकासकांनी सांगितले. या यासंदर्भात बोलताना क्रेडाई या विकासकांच्या संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केली नाही. त्यामुळे व्यावसायिक बॅंकांनीही कमी व्याजदरावर आगामी काळात भांडवल पुरवठा वाढण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. यामुळे रिऍल्टी क्षेत्रासह अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.
सध्या भारतात कर्जावरील व्याजदर ऐतिहासिक निचांकी पातळीवर आहेत. महागाई अजूनही हाताबाहेर गेली नसल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांना वाटते. नरडॅकोचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक मोहनाणी यांनी सांगितले की, सध्या घरकर्जाचे व्याजदर कमी असल्यामुळे बरेच ग्राहक घरांची खरेदी करण्याची शक्यता आहे.
अनारॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, उत्सवाच्या काळामध्ये घर खरेदी भारतामध्ये शुभ मानली जाते. त्यातच व्याजदर कमी पातळीवर राहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात बरेच लोक घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, देशातील मोठ्या आठ शहरांमध्ये या काळात घरांची विक्री 40 टक्क्यांपर्यंत वाढेल.
गेल्या वर्षी उत्सवाच्या काळमध्ये केवळ 50 हजार 900 इतक्या घरांची विक्री झाली होती. बॅंकाही घर विक्री वाढावी यासाठी अप्रत्यक्ष मदत करीत आहेत. बऱ्याच बॅंकांनी घर कर्जाचे व्याजदर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर ठेवले आहेत. प्रक्रिया शुल्कही कमी केले आहे. दोन वर्षापासून घर विक्री समाधानकारक झालेले नाही. बऱ्याच विकासकाकडे तयार घरे पडून आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही घरे विकून भांडवल मोकळे करण्यासाठी विकसक योजना जाहीर करीत आहेत.
आगामी काळात कच्च्या मालाचे दर वाढणार आहेत. महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कमी व्याजदराची परिस्थिती फार काळ टिकणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.